30 सितंबर 2011

भोपाळसेठ, How do you do?


आदरणीय भोपाळसेठ यांना,


जय अग्रसेन,

महाराष्ट्रातील समस्त वाचकवर्गांतर्फे साष्टांग प्रणिपात. आम्ही मराठी माणसे काही ‘भव्य-दिव्य’ असेल तरच साश्तांग प्रणिपाताच्या भानगडीत पडतो. अन्यथा साध्या नमस्कारावर भागवतो. ज्या अर्थी आम्ही आपणास साष्टांग प्रणिपात करीत आहोत, त्या अर्थी त्याचे कारणही काही ‘भव्य-दिव्यच’ असणार, हे नक्की. वास्तविक आपल्या प्रॉडक्टच्या नावातच ‘दिव्य’ असल्यामुळे सर्वांनी आपल्या चरणी पर्मनंट साष्टांग दंडवत घालत आले पाहिजे अशी आपली अपेक्षा असणे साहजिकच आहे. म्हणोनच आम्ही आमचा साष्टांग प्रणिपात आपले चरणी रुजू करतो.

तर पत्रास कारण की सध्या आपल्या ‘प्रॉडक्ट’चे अश्व चौखूर उधळताना दिसत आहेत. फक्त चौखूर उधळताना एका वेळी किमानपक्षी दोन खूर तरी जमिनीवर टेकावेत अशी अपेक्षा असते. चारही खूर हवेत असतील आणि मांड पक्की नसेल तर तोंडघशी आपटावे लागते. तसेच घडताना सध्या दिसत आहे. मलिक अंबरच्या नगरीतील आमच्या एका जबाबदार वाचकाने पाठविलेले निवेदन आम्ही नुकतेच प्रकाशित केले होते. (आमचे बंधू बेरक्या यांनाही त्यांनी ते पत्र पाठविलेले दिसले. कारण तेथेही ते प्रकाशित झाले. एकच लेख दोन ठिकाणी छापण्यास आम्ही हरकत घेत नाही, कारण आमचा वसा लोकशिक्षणाचा आहे.) तर सांगण्यास हरकत नाही की आपल्या संशोधकांनी मोठ्या संशोधनांति प्रकाशित केलेल्या मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या कॉफीटेबल बुकमधून आपल्या दैनिकालाच मुक्ती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकाच पुस्तकात किती घोटाळे असावेत? कोण आहेत याचे कर्ते-करविते?

महाराष्ट्रातील सर्वात जास्त पगाराची नोकरमंडळी आपण नेमली आहे. हा पगार नेमका कशासाठी देता बरे? बरे, माणसे नेमतानाही आपण अशी अशी माणसं नेमली की ज्याचे नाव ते...! कुमारस्वामींबद्दल तर आम्ही खूप आधी आपणास सावध केले होते. ‘सटवाईला मिळाला म्हसोबा’ अशी जगप्रसिद्ध कॉमेंटही आम्ही त्यावर केली. हे कुमारस्वामी काय करतात बरे? त्यांनी ही प्रुफे पाहिली नव्हती का? की ते प्रुफे पाहत नसतात? असो, हा तुमचा परस्पर व्यवहार आहे. आम्ही त्यात कशास पडावे?

आपले ‘सल्लागार’ काय करतात? की ते तुमचे पोटभाडेकरू आहेत? ते आर्थिक क्रांतीत मग्न असतात. तिकडे जीव असलेला माणूस इकडे तुमचा सल्लागार! छान आहे. तुमचा पगार खाऊन तुमच्याचकडे ते दर रविवारी आर्थिक क्रांतीचे धडे देतात! खरे सांगायचे तर ते आर्थिक क्रांतीच्या क्षेत्रातील आद्य क्रांतीकारक आहेत. एकेकाळी मलिकअंबरच्या नगरीत सकाळीच प्रकाशित होणार्‍या एका नियतकालिकाचे प्रमुखपद त्यांच्याकडे असताना त्यांनी अशा अनेक आर्थिक क्रांत्या तेथे घडविल्या. त्या जोरावर त्यांनी पुण्यनगरीत एक फ्लॅट असताना मलिकअंबरनगरीत बंगला बांधला आणि पुण्यनगरीत आणखी एक फ्लॅट बुक केला! आपल्या आगमनापूर्वी पत्रकारितेतील पगार होतेच किती? एवढ्या पगारात इतकी घोडदौड? कमाल है! ही खरी आर्थिक क्रांती. यात किती रिपोर्टरांचे योगदान आहे, हा संशोधनाचा विषय!

तर, अशा या सल्लागाराची मदत या पुस्तकासाठी आपण का नाही घेतली बरे? पण घेतली असती तरी काय झाले असते? हे मुळातच घोटाळेबाज! परवा अमेरिकेवरील हल्ल्याची दशकपूर्ती साजरी झाली. या निमित्ताने आम्हास काही गोष्टी आठवल्या. त्या बाबत इंटरनेटवर बरेच काही काही समोर येत असते. तशातच शेजारचा फोटो समोर आला. ते पाहून आमच्या पूर्वस्मृती जागल्या. या सद्गृहस्थांनी त्या काळी हा फोटो पहिल्या पानावर छापून ‘WTCवरील हल्ल्याआधीचा दुर्मीळ फोटो’ असे वर्णन केले होते. वास्तविक हा फोटो म्हणजे मोठाची विनोद होता. अखेर त्या दैनिकाची राज्यभर पुरती नाचक्की झाली आणि दुसर्‍या दिवशी त्यांना राज्यभरातून छी-थू सहन करावी लागली. वर माफीही मागावी लागली. हा वारसा असणारी माणसे आपणास काय मदत करणार?

याशिवाय आपण नेमलेले वेगवेगळे ‘हेड’ काय करतात? एकदा खराखुरा हेडकाउंट कराच. खरे हेड किती हे कळल्यानंतर आपले हेड नक्कीच जागेवर राहणार नाही? बघा, काहीतरी चांगले करा. आपण एवढ्या दूरवरून आला आहात. जरा जवळून निरीक्षणाची सवय लावून घ्या. फायद्यात राहाल.

जय भोपाळ.

19 सितंबर 2011

दिव्य मराठीने पाजळले अकलेचे दिवे, ‘मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे मार्केटिंग हवे’


औरंगाबाद येथील एका वाचकाने पाठवलेला हा लेख जशास तसा देत आहोत.
- बोरुबहाद्दर

दैनिक दिव्य मराठीने 17 सप्टेंबरच्या मुहुर्तावर ‘हैदराबाद मुक्तीलढा आणि मराठवाडा’ या नावाने एक कॉफीबुक (टपरीवर काचेच्या गिल्लासात कट चहा पिणार्‍या आम्हा मराठवाड्यातील जन्तेला कॉफी कशी माहिती असणार? कॉफीबुक म्हणजे काय ते कसे कळणार?) प्रकाशित केले. मराठवाडी जनतेच्या भावनांना हा विषय नेहेमीच हात घालणारा आहे. मराठवाडी अस्मितेला चुचकारताना मात्र ‘दिव्य मराठीकारांनी’ ज्या असंख्य चुका करून ठेवल्या आहेत, त्या पाहता ‘दिव्य मराठी’चे मार्केटिंग करताना त्यांनी काहीच तारतम्य बाळगलेले नाही, असेच स्पष्ट होते आहे.


1) या ‘कॉफीटेबल बुक’च्या मुखपृष्ठावरील शीर्षकापासूनच चुकांना सुरवात झाली आहे. ‘हैदर अलीने आबाद केलेले ते हैदराबाद’ असा संदर्भ असताना इथे तो शब्द चक्क ‘हैद्राबाद’ असाच आला आहे. हे ‘हैद्रा’ कोण? ही चूक आतील पानांवर मात्र दुरूस्त झालेली दिसते!

2) ‘स्टेट एडिटर’ हे पद भूषविणारे श्री. अभिलाष खांडेकर यांना भारताचा नकाशा वाचता येत नसावा. त्यांनी या पुस्तकाच्या प्रारंभी लिहिलेल्या प्रस्तावनेत हैदराबाद संस्थानाचा ‘देशातील हा असा एक कोपरा होता, जो निजामाच्या जोखडातच राहिला’ असा उल्लेख केला आहे. कोणत्या अर्थाने हैदराबाद संस्थान ‘कोपरा’ ठरते?

3) ‘आपण खेकड्याची वृत्ती स्वीकारल्याने मुक्तीलढ्याचे स्मारक अद्याप होऊ शकले नाही, हे एक कारण हे पुस्तक लिहिण्यामागे आहे’ (‘कॉफीटेबल बुक’ - प्रकरण पहिले - पृष्ठ 13) असे एक वाक्य यात आहे. यामधील ‘आपण’ म्हणजे कोण? मराठवाड्यातील जनता हे पुस्तक लिहिते आहे का?

4) ‘पर्यटनाचे वा पेंग्विन नॅशनल जिऑग्राफीचे आकर्षक प्रत्येक पान ग्लॉसी. सुंदर छायाचित्रांसह असावे, जेणेकरून लोक कुतुहलापोटी पाहतील, त्याची जास्त जाहिरात होईल. तरुण पिढी, परप्रांतीय व मराठवाड्याबाहेरील लोकही हे पुस्तक चाळतील ही देखील एक कल्पना. अगदीच व्यावसायिक भाषेत बोलायचे झाले तर ‘मराठवाडा मुक्तीसंग्रामाचे मार्केटिंग वा ब्रँडिंग होईल.’ इथे ‘दिव्य मराठी’ नेमके कशाचे मार्केटिंग करू पाहत आहे? मुक्तीसंग्रामाचे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मार्केटिंग आणि ब्रँडिंग केले तर नेमके कोणाचे आणि काय भले होणार आहे? अण्णा हजारेंच्या आंदोलनात कुठलेही मार्केटिंग व ब्रँडिंग नसताना उत्स्फुर्तपणे लाखोंच्या संख्येने सहभागी होणारी तरुण पिढी ‘दिव्य मराठी’च्या मार्केटिंगमुळे हैदराबाद मुक्तीसंग्रामाकडे आस्थेने बघेल, असे त्यांना वाटते! जणू हे दैनिक नसल्याने आजवर मुक्तीलढ्याची काहीच माहिती जनतेला झाली नव्हती!

5) या ‘कॉफीटेबल बुक’च्या पृष्ठ क्रमांक 14 वर ‘का हा अन्याय? याचं कारण एकच की याचं मार्केटिंग स्टेट, राष्ट्रीय पातळीवर प्रभावीपणे कधी झालंच नाही. ते व्हावे म्हणून हा प्रपंच.’ ... ‘माझ्या मते मुक्तीलढ्याला प्रसिद्ध तंत्र नसल्याने या लढ्याबद्दल अधिक माहिती पुढे यावी’ या वाक्यांचा अर्थ काय? पहिले संपूर्ण प्रकरण अशा अनेक विसंगत व अप्रस्तुत विधानांनी भरलेले आहे. 

6)  या ‘कॉफीटेबल बुक’च्या पृष्ठ क्र. 15 वर ‘गोविंदभाई श्रॉफ यांनी सोशालिस्ट (समाजवादी पक्ष) पार्टी काढली.’ असा उल्लेख आहे. खरं तर गोविंदभाईंनी काढलेल्या पक्षाचे नाव ‘लीग ऑफ सोशालिस्ट वर्कर्स’ असे आहे. याच पानावर पुढे असे म्हटले आहे, की ‘स्वातंत्र्यसैनिकांचे सत्तेतील व सत्तेबाहेरील असे समाजवादी विरुद्ध कॉंग्रेस असे गट पडले. त्यांनी एकमेकांकडे, त्यांच्या मुक्तीसंग्रामातील कामगिरीकडे दुर्लक्ष केले. मात्र, गोविंदभाई श्रॉफ हे टॉवरिंग पर्सनॅलिटी असल्यामुळे व नंतर ते शैक्षणिक क्षेत्रात कार्यर्‍त झाल्यामुळे नेहेमी चर्चेत व पुस्तकात राहिले. इतर मात्र तेवढे राहिले नाहीत.’ या वाक्यातून दिव्य मराठीच्या विद्वानांना आपले नेमके कुठले ज्ञान पाजळायचे आहे? सरस्वती भुवन शिक्षण संस्थेत पार आधीपासून गोविंदभाई सक्रीय होते. आणि दिव्य मराठी 
मात्र ते नंतर कार्यरत झाल्याचे सांगते!

7) या ‘कॉफीटेबल बुक’च्या दुसर्‍या प्रकरणातील दुसर्‍याच ओळीत ‘14 जिल्ह्यांचे मिळून हैदराबाद संस्थान झाले’ म्हटले आहे. यापुढे ‘नकाशात पाहा’ असा उल्लेख आहे. प्रत्यक्षात नकाशात पाहिल्यानंतर तेथे मात्र 15 जिल्हे नोंदविलेले दिसतात. नकाशातील एकूण जिल्हे तीन पाने मागे आल्यानंतर 1 ने कमी होतात, ही जादू कुठल्या स्टॅटिस्टिक्सचे द्योतक आहे? यापुढे या दैनिकाने उपसंपादक, प्रुफरीडर, आर्टिस्ट यांच्याबरोबरच एक ‘स्टॅटेस्टिशियन’ही नेमायचा का?

8) या एकंदर 122 पानी पुस्तकात अक्षरशः पानोपानी चुका आहेत. केवळ वानगीदाखल वरील उल्लेख केलेले आहेत. स्वामी रामानंद तीर्थ यांचे या लढ्यावरील मूळ पुस्तक ‘हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या आठवणी’ याचा कुठेही उल्लेख सापडत नाही. अखेरच्या पानावर दिलेल्या संदर्भ ग्रंथांच्या यादीतही. या लढ्याच्या सेनापतीने लिहिलेल्या पुस्तकाचीही दखल दिव्य मराठीला घ्यावीशी वाटली नाही. बहुधा स्वामीजींचे ‘मार्केटिंग व ब्रँडिंग’ कमी पडले असावे!

9) हे संपूर्ण पुस्तक मराठीत लिहिले गेले आहे. (यातील काही इंग्रजी शब्दही - उदा. : ‘शो’, ‘टॉवरिंग पर्सनॅलिटी’, ‘ग्लॉसी’, ‘मार्केटिंग व ब्रँडिंग’, ‘ऑप्शनला’, ‘पोलिस ऍक्शन’ इ. - देवनागरी लिपीतच लिहिले गेल्याने या पुस्तकाला मराठीतील पुस्तकाचा दर्जा देण्यास हरकत नाही. पण सहाव्या पानावर ‘प्रोजेक्ट टीम’ अशा इंग्रजी शीर्षकाखाली ‘प्रोजेक्ट कोआर्डिनेटर - वृषाली घाटणेकर, रिसर्च - डॉ. महेश सरवदे, एडिटोरियल टीम - रमेश धाबे, प्रवीण देशपांडे, रोहन पावडे, शरद काटकर, बाबासाहेब डोंगरे, सय्यद नजाकत, दिनेश लिंबेकर, फोटोग्राफी - किशोर निकम, माजीद खान आणि डिझाईन व छपाईवाला अशी सर्व नावे शुद्ध इंग्रजीतून दिली आहेत. हे का म्हणून बरे? पान 5 वर या वृत्तपत्रसमूहाचे अध्यक्ष अग्रवालसेठ स्वतः आपले मनोगत ‘लढवय्यांबद्दल कृतज्ञता’ मराठीत व्यक्त करतात. पण इतरांना इंग्रजीचा आधार का घ्यावासा वाटतो? अशामुळे हे पुस्तक - सॉरी कॉफीटेबल बुक - इंटरनॅशनल दर्जाचे होईल, असे वाटते का?

या ‘कॉफीटेबल बुक’ला ‘महात्मा गांधी मिशन’ या संस्थेने प्रायोजित केले आहे. यात काय व्यवहार झाला, याच्याशी आम्हाला काहीही देणेेघेणे नाही. पण जेव्हा या संस्थेचे सचिव अं. ना. कदम आपल्या छायाचित्रासह या ‘कॉफीटेबल बुक’च्या सातव्या पृष्ठावर ‘स्मरण हुतात्म्यांचे’ व्यक्त करतात, तेव्हा या पुस्तकात काय छापून येते आहे या विषयीही त्यांनी तज्ज्ञांकरवी खातरजमा करून घ्यावयास हवी होती. दान सत्पात्री पडावे, असे थोरामोठ्यांनीच सांगून ठेवले आहे...!

- एक जागरूक वाचक

बेरक्या वाचू नका, त्यामुळे तुमचे काम बिघडत आहे! खांडेकर व लांबेचा डीएममध्ये आदेश


(बेरक्यावरून)

औरंगाबाद- दिव्य मराठीमध्ये फक्त लांजेवार आणि श्रीकांत सराफ दादागिरी करतात असे नाही. तर खांडेकर आणि लांबे  ही हाच पाढा गिरवत आहेत. सतत बातम्या महत्वाच्या  बातम्या  मिस होत असल्याने आणि बाहेरच्या बातम्यांपेक्षा किशोर निकम आणि सामनातील  फोटोग्राफरच्या मारामारीच्या बातम्या जास्त येत असल्याने अखेर खांडेकर आणि लांबे या जोडगोळीने सगळा राग बेरक्यावर काढला आहे.
वाटले तर बातम्या करू नका, पण बेरक्या वाचत जाऊ नका, असा सल्ला खांडेकर आणि लांबे यांनी दिला आहे.  आम्ही तुमचे सिनिअर आहोत, याची आठवण जोडगोळीने करून दिली. आमची बदनामी झाली तर तुम्ही डगमगताल, म्हणून बेरक्या वाचू नका असे खांडेकर आणि लांबे यांनी मिटिंग घेवून सांगितले. 

आता तुम्हीच सांगा त्या निकमला मस्ती करायला काय आम्ही सांगितली होती . त्याने खोटे माणसे पाठवून सामनातील प्रेस फोटोग्राफरला भडकविले हि काय कोणाची चूक म्हणावी. नाचता येईना अंगण वाकडे असा हा प्रकार सुरु आहे. काही कार्यालायात आमच्यावर बंदी घातली होती. पण आता निकमसारखे मोजकेच लोक कार्यालायात इंटरनेट वाचतात. कर्मचार्यांना घरी बेरक्या वाचण्यापासून खांडेकर आणि लांबे कसे रोखणार. त्यांचाही दिवसच बेरक्या वाचनाने सुरु होतो, मग त्यांनीच हे का सांगितले?

ता. क.- आता सांगा बेरक्या वाचल्याने दिव्यचे कर्मचारी बिचकत आहेत यावर कोणाचा विश्वास बसेल का?

14 सितंबर 2011

क्षण एक पुरे ‘प्रेमा’चा... मजनू होतो प्रेम‘दासा’चा...

पेपरवाल्यांनी पेपर काढून विकण्याबरोबरच इतर अनेक उद्योग सुरू केल्याने वृत्तपत्रांच्या कचेरीमध्ये पत्रकारेतर कर्मचार्‍यांची बरीच भाऊगर्दी (आणि बहिणगर्दी) दिसू लागली आहे. एकेकाळी युवामंच असत. आता सख्यांचे मंच असतात. व्यापार्‍यांचे मंच असतात. उद्योगांचे मंच असतात. वाचक सोडून सगळ्यांचेच मंच असतात. (वाचक आपले ‘मुकी बिचारी कुणीही हाका’टाईप असतात. मध्येच ‘मर्जी’ जाणून घेण्याची उबळ काही जणांना येते. पुन्हा सारे काही शांत शांत)

तर अशाच एका मंचाच्या बहिणबाईंची ही कथा. सिद्धेश्र्वरनगरीत एक दैनिक राज्य करीत होते. (‘एक राजा राज्य करीत होता’च्या धर्तीवर ही कल्पना कशी वाटते?) या राज्यात प्रजाजन कमी पगारात भरपूर काम करीत होते. राज्यात सख्यांसाठी विशेष मंच होता. (सख्याहरींसाठीही असाच एक मंच असावा, अशी मागणी अनेकांनी केली होती पण हे प्रकरण आपल्याला आवरणार नाही, हे लक्षात घेऊन राजाने त्याला मनाईहुकुम बजावल्याचे कळते.) या सख्यांच्या मंचाचा गल्ला सांभाळणार्‍या बहिणबाईकडे अधूनमधून सख्यांना एकत्र करण्याचेही काम असते म्हणे. तर या बहिणबाईंनी आपल्या सर्व सख्यांचा समस्त तपशील आपल्या संगणकात बंदिस्त करुन ठेवला. हा तपशील आपल्याकडे बंदिस्त स्वरुपात असल्याचा त्यांचा समज एकदा खोटा ठरला आणि या राज्याच्या जाहिरातमंत्र्यांनी आपल्या संगणकावरून तो पळविला असल्याचे त्यांच्या म्हणे लक्षात आले.

ते जाहिरातमंत्री तर या सखीमंत्री. असे परस्पर चोर्‍या चपाट्या करून कसे चालणार? (अशा चोर्‍या करायला ही काय ‘मर्जी’ची थीम थोडीच आहे?) असो. तर या मंत्रीणबाईंनी त्या मंत्र्यांविरुद्ध राजांकडे तक्रार गुदरली. (गुदरली हा शब्द वापरताना आम्हाला नेहेमीच हसू फुटते) राजांनी तटस्थपणी दाखविण्यासाठी चौकशी सुरू केली. (अशी चौकशी सुरू करावीच लागते. म्हणजे तक्रार करणार्‍याचे समाधान होते आणि ज्याच्याविरुद्ध तक्रार असते त्याच्याववरही वचक बसतो! हे आपले स्वानुभवी तत्वज्ञान!)

अशा तक्रारींचे पुढे काय होते, हे सर्वांनाच माहिती असते. राजाला काय, कुठूनही आपला महसूल वाढण्याशी देणेघेणे असते. त्यामुळे या चोरीचा त्याला मनस्वी आनंदच झाला होता. पण नाटक करणे भाग असते. आपल्या अंमलाखालील विविध ठिकाणच्या इंजिनिअरना बोलावून एक समिती गठित करण्यात आली. या समितीने सिद्धेश्वरनगरीत जाऊन या दोन्ही मंत्र्यांच्या संगणकांची, त्यांच्यातील जोडांची आणि त्यातील साठ्याची बारकाईने पाहणी केली. आता खरी गंमत तर पुढेच आहे.

ही पाहणी मुदलात होती ती जाहिरातमंत्र्यांच्या चोरीसाठी. त्याचे काय काय झाले, ते कळले नाही. पण भलतीच गंमत तेथे घडल्याचे आमच्या कानावर आले. त्याचे झाले असे, की सखीमंत्री आणि बातमीमंत्री यांच्यात सख्यांच्या मंचावरून, राज्याच्या भरभराटीवरून बरीच सखोल चर्चा होत असे म्हणे. या चर्चेसाठी या बहिणबाई संबंधित बातमीमंत्र्यांच्या बंदिस्त कक्षात स्वतःला बराच वेळ बंदिस्त करून घेत असत म्हणे. या बांध-बंदिस्तीबरोबरच त्यांचा संगणकीय संवादही चालू असे म्हणे. नेमका हाच संवाद या तज्ज्ञ इंजिनइरांच्या हाती पडला आणि मग काय महाराजा... काय गंम्म्म्मत झाली म्हणून सांगू... मूळ तक्रार राहिली बाजूलाच...!

प्रेमाचा दास झाल्यावर पत्रकाराचा मजनू होतो आणि मग काय महाराजा, सखी तर अशा वेळी तयारच असते...

तात्पर्य काय? माणसांच्या बदल्या दूर दूर करू नये. कुटुंबापासून दूर राहिले की भावना अनावर होतात आणि दुधाची तहान पर्यायी दुधावर भागवावी लागते...!!!!

1 सितंबर 2011

खुषखबर... कुमारस्वामी आता ‘खा.’ होणार...!

खुष खबर... खुष खबर... खुष खबर... महाराष्ट्र देशीचे महान पत्रककार श्री श्री कुमारस्वामी यांच्या गळ्यात लवकरच ‘खा.’ पदाची माळ (अखेर) पडणार असल्याचे आमच्या खात्रीलायक सूत्राकडून (म्हणजे आमच्या मनातल्या मनात) कळते. 


श्री श्री कुमारस्वामी (श्री श्री ही दुहेरी उपाधी त्यांच्याबद्दल आमच्या मनातील परम आदर दर्शविणारी आहे. गैरसमज नसावा) म्हणजे निधड्या छातीचा पत्रकार! आतापर्यंत त्यांनी आपल्या स्वतःच्या छातीत कित्येक गोष्टी दाबून ठेवल्या. योग्य वेळी त्या त्यांनी बाहेर काढल्या. त्यांच्या अनेक इच्छा होत्या. महाराष्ट्रदेशीच्या सर्वाधिक दैनिकांच्या प्रमुखपदावर काम करून दाखवीन ही प्रतिज्ञा त्यांनी त्यांच्या लहानपणी त्यांच्या आईसमोर केली होती असे मध्यंतरी त्यांच्या मावशीकडून आम्हाला कळले. (या मावशींचा चिरोटे तयार करून विकण्याचा व्यवसाय आहे. पुण्यात आमच्या शेजारीच राहतात.) लहानपणी आपल्या आईला दिलेले वचन म्हातारपणापर्यंत जाताना (खरे तर आम्ही त्यांना म्हातारा म्हणू इच्छित नव्हतो. पण शब्दांचा परिणाम उठून दिसण्यासाठी हा शब्द वापरण्याचा नाईलाज आहे. क्षमस्व) स्मरणात ठेवण्याची त्यांची शक्ती खरोखरच स्पृहणीय आहे म्हणायची. आतापर्यंत इंग्रजी-मराठी धरून मुदलात पाच पेप्रांच्या मेन मेन पोस्टवर श्री श्री कुमारस्वामी यांनी आपली योग्यता सिद्ध केली. सध्या त्यांच्या ‘दिव्य’ बुद्धिमत्तेचा प्रकाश सार्‍या संबंध अख्ख्या अखिल महाराष्ट्रभर फाकतो आहे. 


अर्धा भारत व्यापणार्‍या गटाच्या, अर्धा महाराष्ट्र व्यापणार्‍या पत्राचे आता ते अध्वर्यू आहेत. (पण याला अर्धवट म्हणायचे नाही. सांगून ठेवतो.) त्यांच्या लोकविलक्षण प्रतिभाविलासाने अख्खा महाराष्ट्र मंत्रमुग्ध झाला आहे. त्यांच्या पेप्रात छापून आलेल्या असंख्य चुकांकडे तमाम वाचक इतक्या मोठ्या मनाने पाहतात की ज्याचे नाव ते. त्यांचे अग्रलेख म्हणजे साक्षात सरस्वतीचे तांडवनृत्य ! (अरेरे ... उपमा चुकली वाटते) 
तर श्री श्री कुमारस्वामी यांच्या ‘खा.’ पदाबद्दल आम्ही बोलत होतो. ज्या प्रमाणे त्यांनी आपल्या मातुःश्रींना सर्वाधिक पेप्रांच्या प्रमुखपदांवर काम करून दाखविण्याचे वचन दिले होते तद्वतच त्यांनी आपल्या (तत्कालीन) प्रेयसीस (प्रोबेशनवर असताना इंप्रेशन मारण्यासाठी) कधी ना कधी ‘खा.’ होऊन दाखवीन अशी बढाई मारली होती. ‘खा.’ झाल्यावरच आपण (आपल्या लग्नाचे) लाडू खाऊ असे तिने सांगितल्याने त्यांचा नाईलाज झाला. तो नाईलाज कायम राहिला. (एरव्हीही पत्रकारांना पोरी देण्यासाठी त्यांचे बाप नाराजच असत. दरिद्री पत्रकाराला पोरगी देण्यापेक्षा विहिरीत ढकललेली बरी, असे त्यांचे म्हणणे असते. त्यामुळे आमचीही खूप अडचण झाली होती. आता बरे आहे.) तर सांगायचा मुद्दा हा, की आताही ती त्यांना (आपल्या पती व मुलांसह) भेटत असते आणि नजरेनेच ‘खा.’बद्दल विचारत असते ! ती नजर (म्हणजे काय बाप्पा...!) त्यांना बोचत असते. त्यामुळे ते आता जिद्दीला पेटले आहेत.

खरे तर याची सुरवात झाली ते महाराष्ट्र वर्तमानाच्या काळात. ते समयी (म्हणजे साधारण 1997 साली) भारतवर्षी सोनियाचा दिनु उगविला होता. या सोनेरी प्रकाशात न्हाऊन निघत श्री श्री कुमारस्वामी यांनी भारतभर त्या किरणांचा पिच्छा पुरविला आणि सार्‍या आयुष्याची लेखणी एका महिन्यात झिजविली. हे फिरणे इतके होते, की एखाद्यास कमरेची व्याधी जडावी.) हे महाराष्ट्र वर्तमान की सोनियाचा दिनविशेष हेच कोणाला कळेनासे झाले होते. याचा उत्तरार्ध म्हणून त्याच वेळी सोनियाचा उंबरा ओलांडून ‘खा.’ होता येईल असे त्यांना वाटो लागले. पण हाय रे रामा... (सॉरी. श्री श्री कुमारस्वामी यांना रामाची ऍलर्जी आहे.) हाय रे दैवा... (पुन्हा सॉरी. त्यांना दैववादाचीही ऍलर्जी आहे) जाऊ दे... मरू दे... बाईंना मराठी पेप्रं पाहण्याची रुची नव्हती आणि विंग्रजीतून निघणारे त्यांचे भावंड वर्तमान श्री श्री कुमारस्वामी यांचे ट्रान्सलेशन विंग्रजीत छापणेस तयार नव्हते. ते मुळे ती मेहनत मागे पडली. मग कालौघात श्री श्री कुमारस्वामींनी खूप मेहनत घेतली. कधी महाराष्ट्राचे वर्तमान वापरले तर कधी लोकांची सत्ता. कधी शेठजींचा पदर धरला तर कधी भोपाळसेठांचे धोतर. पण अद्यापपर्यंत उपेग काही झाला नाही. 

पण काळाच्या ओघात त्यांची धार (म्हणजे त्यांच्या लेखणीची धार) भाजप-संघाच्या बाबतीत खूपच तीक्ष्ण होत गेली. जे प्रमाणे मुंबईतील गटारांचा प्रश्न मांडताना ते पॅरिसच्या नाईटक्लबबाहेरील सांडपाण्याच्या व्यवस्थेचा आढावा घेतात तसेच दुष्काळ, दंगली, राजकारण, परीक्षेतील गैरव्यवहार, राजकारणातील भ्रष्टाचार, रस्त्यांची दुरवस्था, कूपनलिकेत अडकलेली बालके, हातपंपांचा प्रश्न, वाहनांमुळे वाढणारे प्रदूषण, अण्णांचे आंदोलन, कोकण रेल्वेमार्गावर कोसळणार्‍या दरडी, रेल्वेस्टेशनवरील चहाचा दर्जा या प्रत्येक गोष्टींचा संबंध ते संघपरिवाराशी जोडून त्याचा खरपूस समाचार घेऊ शकतात. याच मुद्‌द्यावर चिदंबरम गृहमंत्री होऊ शकतात तर आपण ‘खा.’ कसे होऊ शकत नाही, या विचाराने त्यांना सध्या पछाडले आहे म्हणे.

दिव्याचा प्रकाश पसरवताना पहिल्या दिवसापासून त्यांनी ही काळजी घेतली आहे. त्यामुळे अनेक वेळा चमत्कारिक स्थितीही उद्भवली. पण असे चमत्कार त्यांच्याच लीलेचे भाग आहेत. त्याकडे दुर्लक्ष करणेच योग्य. पर्वा अण्णांच्या आंदोलनाला संघाचा पाठिंबा असल्याची खबर लागताच त्यांना परमसंतोष झाला आणि त्या संतोषाच्या भरात (आवेगात म्हणायचे होते) त्यांनी खरपूस अग्रलेख लिहून टाकला! अग्रलेखात भाजप, संघपरिवाराचा उल्लेख नसेल तर त्यांचा ऑपरेटर कामच करत नाही म्हणे!

मध्यंतरी मा. पंतप्रधानांनी निवडक संपादकांना चर्चेसाठी बोलावले तेव्हा श्री श्री कुमारस्वामी पहिल्या पाचात (म्हणजे निमंत्रित केलेल्या पाच जणांत पाचवे) आले. एक पत्रकार म्हणजे एक स्तंभ म्हणायचे झाले तर हा पाचवा स्तंभ. तर त्यांनी तेव्हाही आपल्यात पंतप्रधान अवतरल्याचे दाखवून देताना ‘खा.’ ची चव अनुभवण्याचा प्रयत्न केला. टीव्हीवर त्यांचे दर्शन सार्‍या मराठी जगाला जाहले.

टीव्हीवर आल्याशिवाय ‘खा.’चा मार्ग प्रशस्त होणार नाही म्हणून आता त्यांनी तार्‍यांच्या चौकटीत आपला चेहरा प्रकट करण्यास सुरवात केली आहे. या बदल्यात तार्‍यांच्या राज्यातील राजाला आपल्या कॉलमातील चौकट त्यांनी बहाल केली. दोघांचेही बरे चालले आहे, असे म्हणतात.

तर मूळ मुद्दा हा, की उद्या-परवा कॅन्सर उपचारांसाठी सुप्रसिद्ध असलेल्या रुग्णालयातून उपचार घेऊन बाईसाहेब परतल्या की श्री श्री कुमारस्वामी आपल्या अग्रलेखांची आणि रविवारच्या लेखांची आणि मागील 20 वर्षांतील लेखांची फाईल घेऊन भेटीला जाणार आहेत म्हणे. एवढ्या फायली पाहूनच बाईसाहेब त्यांना ‘खा’ म्हणतील अशी त्यांना आशा आहे. 

मागून आलेले अनेकजण पुढे गेले, महाराष्ट्राच्या वर्तमानातूनच गेले याचे त्यांना फार वाईट वाटते, असे त्यांची कामवाली सांगत होती. कामवालीला तिच्या मालकिणीने सांगितल्याचे कळते. त्यांची आमची कामवाली एकच. म्हणून आम्हाला हे वर्तमान कळले. असो. एक मराठी माणूस ‘खा.’ होणार असेल, तर राज ठाकरेंच्या खालोखाल आनंद आम्हाला होणार. या आनंदातच ही बातमी आपणापर्यंत पोहचविण्याचे आम्ही ठरविले.
आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे भोपाळकडे...

14 जुलाई 2011

आता सकाळ च्या वाचकांनाच भरली हुडहुडी...!

सकाळ मध्ये सध्या धमाल चालू आहे. मागे ३ जुलै रोजी 'आम्हाला वगळा...' हा अनंतराव भालेराव यांचा लेख जशाला तसा सकाळ च्या मुख्य अंकात आणि औरंगाबाद टुडे मध्ये दोन वेळा छापला गेला. आज पोस्ट खात्याची एक बातमी औरंगाबाद टुडेच्या पान ३ आणि पान ८ वर जशीच्या तशी छापून आली आहे. एकाच किमतीत दोन अंक न देता एकाच बातमी दोन वेळा छापण्याच्या या पत्रकारितेला काय म्हणायचे? पवार साहेब, नुसते बस थांबे रंगवून अंक विक्री वाढत नसते. अंक चांगला काढावा लागतो, मग लोक आपोआप विकत घेतात. मग १ रुपयात अंक देण्याची सुद्धा गरज उरत नाही...! 


10 जुलाई 2011

औरंगाबादकराना घडले भेटीच्या `भिक`वस्तूचे दिव्य दर्शन !

औरंगाबाद्करांची मर्जी जाणून घेण्याची चढाओढ काही महिन्यापूर्वी रंगली होती. मर्जीच्या या खेळात भोपाळसेठ यांनी २०० रुपयात दिव्यदर्शनाची ऑफर देऊन वाचकांची मर्जी जिंकली. त्याच वेळी तमाम वाचकांना एक भेटवस्तू देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते. दिव्य दर्शनाच्या भाराने झुकलेल्या पब्लिकने खूप रेटा सुरु केल्याने अखेर या भेटवस्तू वाटण्याचे ठरवण्यात आले. 

लोकांना वाटले, कि मर्जी जाणून घ्यायला हे लोक दारोदार फिरले, मग भेट देण्यासाठी पुन्हा दारी येतील. पण हाय रे दैवा, या वेळी उलटेच घडले. दारीच काय, गल्लीत सुद्धा कोणी फिरकले नाही! समस्त गरजू भेटइच्छुकांनी आता आपल्या दारी येऊन भेट स्वीकारावी, असे आवाहन त्यांनी केले. तब्बल २०० रुपयांच्या भेटीसाठी आतुरलेले हजारो जीव दिव्याखाली धावले... आणि काय सांगायचे महाराजा... सर्व जण अतिशय तृप्त झाले आहेत. 

भोपाळसेठ यांनी पार दूर देशीहून प्लास्टिकच्या ३ बरण्या आणि बायकांनी नाक पुसण्याचे ३ फडके असा साधारण ४० रुपयात खरेदी केलेला ऐवज आणून वाटण्यास सुरवात केली. ही मौल्यवान भीक स्वीकारण्यास सध्या दिव्याच्या अंगणात भल्यामोठ्या रांगा लागलेल्या आहेत. असली फालतू भिक स्वीकारण्यापेक्षा ती सोडून देण्याचे विचार लोक करतात पण पुन्हा - चोराची लंगोटी - म्हणून रांगेत उभे राहतात. 
रांगा लागल्या पण तिथे पावसापासून संरक्षण नाही. बिचारे ४० रुपयाच्या भिकेसाठी आपला लाखमोलाचा जीव अडकवून उभे आहेत. 

अशा प्रकारे वाचकांची मर्जी जाणून घेवून आता औरंगाबादेत आपलीच मर्जी चालविण्याचा प्रकार सुरु झाला असून उर्वरित महाराष्ट्रासाठी हा प्रेमाचा संदेश देण्यासाठी आम्ही हे लेखन केले आहे. यात कोणाची बदनामी करण्याचा आमचा हेतू नाही. त्यामुळे कोणीही आम्हाला कायदेशीर इलाज करण्याचा इशारा देयू नये, ही विनंती...!