25 जून 2011

आम्ही खूप घाबरलो आहोत

आज सकाळ पासून आम्ही खूप घाबरलो आहोत. मराठवाड्याचे पवित्र पत्र असलेल्या दैनिकात आमच्यावर कारवाई होणार असल्याचे वाचले, आणि आमचे हातपाय गळाले. त्यामुळे आम्ही हे लेखन डोक्याने करीत आहोत. आता आमच्या मनात एकाच विचार आहे, आमच्या बायका-पोरांचे काय होणार? परमेश्वरी कृपेने आम्हाला एक बायको, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. पुण्यात एका छोट्याशा सदनिकेत आम्ही राहतो. आमची सगळी ग्राच्युईती खर्चून १० टक्के कोट्यातून आम्हाला ही जागा मिळाली. त्याचे कर्जही अजून फिटले नाही. आम्हाला अटक झाली आणि आम्हाला तुरुंगात टाकले तर त्यांचे काय होणार? माझी आपणा सर्वाना जाहीर नम्र विनंती आहे, की मला माफ करा.

मी कोणाची बदनामी केली नाहीआम्ही पुण्यात बसतो पण देशभर असतो. आमच्यावर कारवाई झाली, तर मायावती, जयललिता यांची कामे कोण करणार? एक मराठी माणूस देशभर जाऊन नाव कमावतो हे किती महत्वाचे आहे!

अशा परिस्थितीत आम्ही मराठी वृत्तपत्र सृष्टीचा मनोरंजक आढावा घेत आहोत. असे करताना थोडे इकडे-तिकडे होतही असेल पण ते तर कुमार स्वामींच्या पहिल्या लेखातही झाले होते! तर असे हे होतच असते. त्याकडे दुर्लक्ष करावे आणि उदार मानाने आम्हाला माफ करून आमच्यावर कोणताही गुन्हा दाखल होणार नाही असे पहावे. यापुढे आम्ही कुण्णा-कुण्णावर टीका करणार नाही. काळी-पांढरी म्हणून डिवचणार नाही, श्याम म्हणून हिणवणार नाही, चक्रधर स्वामींचे लीळाचरित्र वाचणार नाही, ऋषी मुनी म्हणनार नाही, ये-पी संबोधणार नाही. डोंगरधारी असे चिडवणार नाही. आम्ही अगदी सरळ वागू. एख्याद्या क्राईम रिपोर्टरने एखाद्या पोलीसावाल्याशी वागावे, तसे आम्ही तुमच्याशी वागू. त्यासाठी ग्यारेंटर म्हणून आम्ही कुणाच्या सह्या आणायच्या हे तुम्हीच सांगा.

कृपया आमच्यावर कारवाई करू नका. आम्ही बालबच्चेवाले आहोत. पाठीवर मारा पोटावर नको.

आपलाच पण कुणाचाच नसलेला

बोरूबहाद्दर प्रेसवाले

23 जून 2011

मीडिया पर असली हमला तो पत्रकारों का भयंकर आर्थिक शोषण है

साभार :

यकीन मानिये, वेज बोर्ड के कारण कोई अखबार बंद नहीं होने जा रहा : सबका दर्द सुनने-सुनाने वाले पत्रकारों के बड़े हिस्से को श्रमजीवी पत्रकारों के वेतनमान पर रिपोर्ट देने वाले जस्टिस मजीठिया आयोग की वेज बोर्ड रिपोर्ट के बारे में कुछ मालूम नहीं होता, इसका लाभ मिलना तो दूर की बात है.

इसके बावजूद अखबार प्रबंधकों ने वेज बोर्ड को मीडिया पर हमला बताकर हल्ला मचाना शुरू कर दिया है. जबकि मीडिया पर असली हमला तो पत्रकारों का भयंकर आर्थिक शोषण है. आखिर इतनी कठिन परिस्थितियों में लगातार काम करके भी एक पत्रकार किसी प्रोफेसर, सीए, इंजीनियर, डॉक्टर, आइएएस या कंप्यूटर इंजीनियर से आधे या चौथाई वेतन पर क्यों काम करे? अभिव्यक्ति की स्वतंत्रता चाहिए तो यह सवाल हर नागरिक और हर मीडियाकर्मी को पूछना चाहिए. कोयलाकर्मियों और शिक्षक-कर्मचारियों की तरह मीडियाकर्मियों को भी अपने वेज बोर्ड के बारे में जागरूक होना चाहिए. वरना अखबार प्रबंधकों की लॉबी तरह-तरह से टेसुए बहाकर एक बार फिर पत्रकारों को अल्प-वेतनभोगी और बेचारा बनाकर रखने में सफल होगी.
आज जो अखबार प्रबंधक नये वेज बोर्ड पर आंसू बहा रहे हैं, उन्हें नहीं भूलना चाहिए कि उनके प्रोडक्ट यानी अखबार में जो चीज बिकती है- वह समाचार और विचार है. अन्य किस्म के उत्पादों में कई तरह का कच्चा माल लगता है. लेकिन अखबार का असली कच्चा माल यानी समाचार और विचार वस्तुतः संवाददाताओं और संपादनकर्मियों की कड़ी मेहनत, दिमागी कसरत और कौशल से ही आता है. इस रूप में पत्रकार न सिर्फ स्वयं कच्चा माल जुटाते या उपलब्ध कराते हैं, बल्कि उसे तराश कर बेचने योग्य भी बनाते हैं.
इस तरह देखें तो अन्य उद्योगों की अपेक्षा अखबार जगत के कर्मियों का काम ज्यादा जटिल होता है और उनके मानसिक-शारीरिक श्रम से कच्चा माल और उत्पाद तैयार होता है. तब उन्हें दूसरे उद्योगों में काम करने वाले उनके स्तर के लोगों के समान वेतन व अन्य सुविधाएं पाने का पूरा हक है. दुखद है कि मीडियाकर्मियों के बड़े हिस्से में इस विषय पर भयंकर उदासीनता का लाभ उठाकर अखबार प्रबंधकों ने भयंकर आर्थिक शोषण का सिलसिला चला रखा है.
जो अखबार 20 साल से महत्वपूर्ण दायित्व संभाल रहे वरीय उपसंपादक को 20-25 हजार से ज्यादा के लायक नहीं समझते, उन्हीं अखबारों में किसी चार्टर्ड एकाउंटेंट, ब्रांड मैनेजर या विज्ञापन प्रबंधक की शुरूआती सैलरी 50 हजार से भी ज्यादा फिक्स हो जाती है. सर्कुलेशन की अंधी होड़ में एजेंटों, हॉकरों और पाठकों के लिए खुले या गुप्त उपहारों और प्रलोभनों के समय इन अखबार प्रबंधकों को आर्थिक बोझ का भय नहीं सताता. चार रुपये के अखबार की कीमत गिराकर दो रुपये कर देने या महज एक रुपये में किलो भर रद्दी छापने या अंग्रेजी के साथ कूड़े की दर पर हिंदी का अखबार पाठकों के घर पहुंचाने में भी अखबार प्रबंधकों को गर्व का ही अनुभव होता है. लेकिन जब कभी पत्रकारों को वाजिब दाम देने की बात आती है, तब इसे मीडिया की स्वतंत्रता पर हमले जैसे हास्यास्पद तर्क से दबाने की कोशिश की जाती है.
आज इन मुद्दों पर एक सर्वेक्षण हो तो दिलचस्प आंकड़े सामने आयेंगे-
  • 1. किस-किस मीडिया संस्थान में वर्किंग जर्नलिस्ट वेज बोर्ड लागू है?
  • 2. जहां लागू है, उनमें कितने प्रतिशत मीडियाकर्मियों को वेज बोर्ड का लाभ सचमुच मिल रहा है?
  • 3. मीडिया संस्थानों में प्रबंधन, प्रसार, विज्ञापन जैसे कामों से जुड़े लोगों की तुलना में समाचार या संपादन से जुड़े लोगों के वेतन व काम के घंटों में कितना फर्क है?
  • 4. मजीठिया वेतन आयोग के बारे में कितने मीडियाकर्मी जागरूक हैं और इसे असफल करने की प्रबंधन की कोशिशों का उनके पास क्या जवाब है?
  • 5. जो अखबार मजीठिया वेतन आयोग पर चिल्लपों मचा रहे हैं, वे फालतू की फुटानी में कितना पैसा झोंक देते हैं?
जो लोग यह कह रहे हैं कि पत्रकारों को वाजिब वेतन देने से अखबार बंद हो जायेंगे, वे देश की आखों में धूल झोंककर सस्ती सहानुभूति बटोरना चाहते हैं. जब कागज-स्याही या पेट्रोल की कीमत बढ़ती है तो अखबार बंद नहीं होते. दाम चार रुपये से घटाकर दो रुपये करने से भी अखबार चलते रहते हैं. हाकरों को टीवी-मोटरसाइकिल बांटने और पाठकों के घरों में मिठाई के डिब्बे, रंग-अबीर-पटाखे पहुंचाने से भी अखबार बंद नहीं होते. प्रतिभा सम्मान कार्यक्रमों और महंगे कलाकारों के रंगारंग नाइट शो से भी कोई अखबार बंद नहीं हुआ. शहर भर में महंगे होर्डिंग लगाने और क्रिकेटरों को खरीदने वाले अखबार भी मजे में चल रहे हैं. तब भला पत्रकारों को वाजिब मजूरी मिलने से अखबार बंद क्यों हों? इससे तो पत्रकारिता के पेशे की चमक बढ़ेगी और अच्छे, प्रतिभावान युवाओं में इसमें आने की ललक बढ़ेगी, जो आ चुके हैं, उन्हें पछताना नहीं होगा. इसलिए यकीन मानिये, मजीठिया वेतन बोर्ड के कारण कोई अखबार बंद नहीं होने जा रहा. वक्त है पत्रकारिता को वाजिब वेतन वाला पेशा बनाने का. सबको वाजिब हक मिलना चाहिए तो मीडियाकर्मियों को क्यों नहीं?
एक बात और. पत्रकारों की इस दुर्दशा के लिए मुख्यतः ऐसे संपादक जिम्मेवार हैं, जो कभी खखसकर अपने प्रबंधन के सामने यह नहीं बोल पाते कि अखबार वस्तुतः समाचार और विचार से ही चलते हैं, अन्य तिकड़मों या फिड़केबाजी से नहीं. प्रबंधन से जुड़े लोग एक बड़ी साजिश के तहत यह माहौल बनाते हैं कि उन्होंने अपने सर्वेक्षणों, उपहारों, मार्केटिंग हथकंडों, ब्रांड कार्यक्रमों वगैरह-वगैरह के जरिये अखबार को बढ़ाया है. संपादक भी बेचारे कृतज्ञ भाव से इस झूठ को स्वीकार करते हुए अपने अधीनस्थों की दुर्दशा पर चुप्पी साध लेते हैं. पत्रकारिता का भला इससे नहीं होने वाला. समय है सच को स्वीकारने और पत्रकारिता को गरिमामय पेशा बनाने का, ताकि इसमें उम्र गुजारने वालों को आखिरकार उस दिन को कोसना न पड़े, जिस दिन उन्होंने इसमें कदम रखा था.

लेखक डा. विष्णु राजगढ़िया पटना और दिल्ली में ''समकालीन जनमत'' मैग्जीन के लिए काम कर चुके हैं. उसके बाद भोपाल के माखन लाल चतुर्वेदी राष्ट्रीय पत्रकारिता विश्वविद्यालय में व्याख्याता के बतौर काम किया. फिर प्रभात खबर के धनबाद संस्करण में स्थानीय संपादक और प्रभात खबर इंस्टीट्यूट के निदेशक रहे. नई दुनिया के झारखंड संस्करण के ब्यूरो चीफ के रूप में रांची में कार्यरत.

20 जून 2011

‘सल्लागार’ म्हणजे काय रे भाऊ?

(आम्ही नुकतेच औरंगाबाद नगरीत जाऊन आलो. तेथील एका ग्रुपमध्ये एक मजेदार गोष्ट ऐकण्यास मिळाली. ती आपणासमोर सादर...)

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. नेहेमीप्रमाणे मध्यरात्री तो स्मशानात पोहोचला. काळोखात सळसळणार्‍या पिंपळाच्या फांदीवर उलट्या लटकणार्‍या वेताळाला त्याने खाली खेचले आणि एका झटक्यात त्याला खांद्यावर टेकून तो स्मशानाच्या बाहेर निघाला. वेताळ खरे तर आता म्हातारा झाला होता. मागच्या अनेक पिढ्यांच्या साक्षीने राजा विक्रमादित्य त्याला खांद्यावर टाकून बाहेर पडत असे आणि आपल्या खाशा युक्तीने त्याच्या तावडीतून सुटून तो परत आपल्या आवडत्या पिंपळावर येऊन लटकत असे. 
आजही तसेच झाले. बाहेर पडताच विक्रमादित्याने आपल्या बुलेटला किक मारली. रात्रीच्या भयाण अंधारात फायरिंगचा ‘डुग डुग डुग’ असा भेसूर आवाज करीत बुलेट शहराच्या दिशेने निघाली. विक्रमादित्याने आज काहीही न बोलण्याचा निश्चय केला होता. कारण त्याने तोंड उघडले तर वेताळ पुन्हा एकदा हातातून सटकून जाईल, याची त्याला खात्री होती. वेताळ नेहेमीप्रमाणे विक्रमादित्याच्या कानाशी झुकला आणि त्याने विचारले, ‘‘हे विक्रमादित्या, तू तुझा हट्ट सोडत नाहीस आणि मी माझा क्रम चुकत नाही. तुला ठावूक असतानाही माझ्या प्रश्नाचे खरे उत्तर दिले नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायाशी लोळू लागतील.’’ त्याच्या धमकीला विक्रमादित्य आजही घाबरला नाही. त्याने आपली बुलेट रस्त्याच्या कडेला घेतली आणि एका बस स्टॉपशेजारी उभी केली. दोघेही बस स्टॉपच्या आतील आसनावर येऊन बसले. 

वेताळ म्हणाला, ‘‘हे विक्रमादित्या, आजकाल सर्वत्र ‘सल्लागार’ या पदाची खूप चलती आहे. कोणत्याही पदामागे हे नाव लावून काही जण लक्षावधींची कमाई करीत आहेत. हे ‘सल्लागार’ कसे जन्मतात? कसे बनतात? तसे होण्यासाठी कोणते कौशल्य लागते? ते मिळविण्यासाठी काय मेहनत करावी लागते? याची उत्तरे तुला ठावून असतील तर मला सांग. खोटे बोललास, तर तुझ्या डोक्याची....’’

त्याचे बोलणे मध्येच अर्धवट तोडत विक्रमादित्य म्हणाला, ‘‘हे वेताळा, आता तुझे ब्लॅकमेलिंग बस्स झाले. मला ब्लॅकमेल करण्यास तू पत्रकार आहेस की ‘आरटीआय’चा कार्यकर्ता? तुला उत्तरच हवे आहे, तर मी देईन. माझ्या डोक्याची शकले करून घेण्याची माझी इच्छा नाही. ऐक तुझ्या प्रश्नाचे उत्तर. पण हे उत्तर मी तुला एका गोष्टीच्या रूपाने देणार आहे. ही इसापनीतीतील गोष्ट आहे. त्यामुळे प्राणी कसे काय बोलू शकतात वगैरे फालतू प्रश्न मला विचारू नकोस.’’
वेताळ म्हणाला, ‘‘विक्रमादित्या, मला माझ्या प्रश्नाचे उत्तर मिळाले की बस्स झाले. उगाच हट्टीपणा करण्यासाठी मी रामदेव थोडाच आहे? चल बोल...’’

विक्रमादित्य सांगू लागला ः
एक छानसं कुरण होतं. तिथं अनेक गायी आणि बैल गुण्यागोविंद्याने नांदत असत. सर्वजण तेथे एकसमान होते पण त्यातील काही जण विशेष होते. स्वतःला धष्टपुष्ट समजणारा एक बैल त्या कळपात होता. आपल्या कळपातील नव्या, गुणवान गोवंशाचा जनक आपणच, असा दावा तो करीत असे. आपल्या वीर्यवान वृत्तीमुळेच आपल्या कळपाची भरभराट होत असल्याचे त्याचे म्हणणे होते. आपण चांगलेच पुष्ट असल्याची त्याची बतावणी अशी होती की त्या कुरणाच्या मालकाला त्याच्यावर भलताच लोभ जडला. आपल्या कुरणात अधिक चांगल्या वंशाची पैदास व्हावी यासाठी या बैलाचा उपयोग करण्याचे त्याने ठरविले. या बैलाचा अधिक चांगल्या प्रकारे पुष्ट करण्यासाठी त्याने या बैलाला आपल्या महालातील खास गोठ्यात आणून बांधले. त्याला उत्तम खुराक सुरू केला. हाच बैल आपल्या कळपाचा उद्घार करील, याची त्याला खात्री वाटत होती. कृत्रिम रेतनाद्वारे त्याच्या वीर्याचा उपयोग करण्यासाठीही मालकाने तयारी चालविली होती. पण हाय रे दैवा, दोन-चार वर्षे उलटली, तरी या बैलाद्वारे गोवंशवृद्धी होईना. आधी त्याला वाटले, आपल्या गोधनातच काही फॉल्ट असेल. पण तपासणीअंति हे बैलोबा बिन‘कामा’चे असल्याचे मालकाच्या लक्षात आले. मग मालकाने त्याला गोठ्याबाहेरच काढले.

भुकेजलेला हा बैल नव्या कुरणाच्या शोधात निघाला. निघण्याआधी मात्र त्याने एक शक्कल लढविली. आपल्या तमाम जातभाईंना आणि इतर कळपांना, आता आपण अधिक चांगल्या कुरणाच्या शोधात निघण्यासाठी सध्याच्या कुरणाचा त्याग करीत आहोत, अशी बतावणी त्याने केली. ज्यांनी हे ऐकले, त्यांना या विषयाशी फारसे देणेघेणे नव्हते!

तर, हा बैलोबा रान हुंंगत हुंगत पुढे निघाला. तसे पाहिले, तर त्याने जागोजागी तहानलाडू-भूकलाडूचे गुप्त साठे करून ठेवले होते, त्यामुळे भूक लागली की भूक भागत होती. पण साठे किती दिवस पुरणार? काही दिवसातच त्याचे फाके पडू लागले. तो रोडावू लागला. तशातच एक छोटे कुरण त्याला लागले. सध्याची भूक तर भागली. पण मोठ्या कुरणाचे आकर्षण त्याला गप्प बसू देई ना. मध्येच एखादा फेरफटका मारण्यासाठी तो बाहेर पडे. 

एके दिवशी असेच झाले. तो बाहेर पडून अंमळ दूरच पोहोचला. खूप दूरवर त्याला एक हिरवेगार कुरण दिसलेे. एवढे सुंदर कुरण त्याने कधीच पाहिले नव्हते. त्याच्या मनातील आशेला पालवी फुटली. आपल्या दुडक्या चालीने तो कुरणाच्या रोखाने निघाला. कुरण जवळ जवळ येऊ लागले. आहाहा... काय ते कुरण. हिरवे गार. जिकडे पाहावे तिकडे हिरवळ. थंडगार स्वच्छ पाण्याचे जागोजागी साठे. गवतात तरी किती प्रकार. तो आणखी जवळ आला. पाहतो, तर काय... छान, धष्टपुष्ट गायी या कुरणात स्वच्छंदपणे मौजमस्ती करीत चरत होत्या. त्याच्या जिभेला पाणी सुटले. मस्त हिरवेगार गवत खाऊन खूपच दिवस झाले होते. नव्हे, वर्षे लोटली होती. इथे तर इतके पौष्टिक गवत होते, की खाई त्याला खवखवे! सोबत थंडगार पाणी आणि साथीला पुष्ट गायींचे मनोरंजन...! तो कुरणाच्या आणखी जवळ आला. आता मात्र त्याला राहवेना. तो धावतच सुटला. पण हे काय...? कुरणाच्या सीमेवर काटेरी तारांचे कुंपण? अरे देवा... घात झाला. आता काय करायचे? समोर हिरवेगार कुरण. छानसे पाण्याचे साठे. पुष्ट गायींची सोबत आणि वाटेत हे अभद्र काटेरी कुंपण? त्याची चाल थांबली.

तो विचारात पडला. आता काय करायचे? कुंपण चांगले शिंगाइतके उंच होते. तो तिथेच थांबला. इकडेतिकडे पाहू लागला. काही वेळातच, एक म्हातारा बैल त्याच्याकडे येत असल्याचे त्याला दिसते. त्याला हायसे वाटले. बरे झाले, सोबत झाली... थोड्या गप्पा मारू... थोडा विचार करू आणि मार्ग काढू असे त्याने ठरविले. 

म्हातारा बैल जवळ आला. त्याने आस्थेवाईकपणे बैलोबाची विचारपूस केली. हवापाण्याच्या गप्पा झाल्या. म्हातार्‍या बैलाने हळूच विचारले...‘समोरचे कुरण आवडले?’... बैलाबाने लाजून मान हलविली, तसा त्याच्या गळ्यातील घुंगरांचा मंजूळ ध्वनी सार्‍या शिवारात घुमला.

‘कुरण आवडले, की गायी?’... म्हातार्‍या बैलाने विचारले, तसा बैलोबा आणखीच लाजला. एव्हाना त्याच्या पौरुषाची चलबिचल सुरू झाली होती! सुष्ट कुरण... पुष्ट गायी... पण दुष्ट कुंपण. त्याला राग आला. पण क्षणभरच. पुन्हा एकदा पौरुषाची चलबिचल सुरू झाली.

म्हातारा बैल म्हणाला, ‘माझ्याजवळ एक आयडिया आहे.’
बैलोबा उतावीळपणा लपवत म्हणाला, ‘सांगा ना.’
म्हातारा बैल म्हणाला, ‘एक काम कर. वीस पावले मागे जा. जोराने धावत सूट. कुंपण 10 फुटांवर आले, की जोराची झेप घे. तू थेट कुरणात जाशील.’

बैलोबा मोठ्या खुशीत पावले मोजत निघाला. वीस पावले जाताच थांबला. गर्रकन मागे वळला. मोठ्या खुशीने मान हलविली. घुंगरांचा आवाज घुमला. खुराने जमीन उकरीत बैलोबा धावत निघाला... प्रचंड वेगाने धावत धावत तो कुंपणापासून 15 फुटांपर्यंत पोहोचला आणि करकचून ब्रेक लावल्यागत जागीच थांबला. जागीच थांबल्याने त्याचे खूर जमिनीत घुसले होते. म्हातारा बैल पुन्हा जवळ आला. बैलोबा म्हणाला, ‘कॉन्फिडन्स येत नाही.’ म्हातारा बैल म्हणाला, ‘आणखी दहा पावलं मागे जा.’ पुन्हा तोच क्रम. पुन्हा करकचून ब्रेक! इकडे पौरुषाची चलबिचल वाढली होती. आकार बदलू लागला होता. जुन्या काळी जनावरांच्या दवाखान्यात नैसर्गिक रेतनासाठी आणलेल्या खास बैलाची जशी अवस्था असायची, तसे बैलोबाचे पौरुष आता डोकावूही लागले होते. 

आता त्याने ठरविले, थांबायचे नाही. इनफ इज इनफ. एव्हाना बैलोबा 60 फुटांपर्यंत पोहोचला होता. त्याने आता ठामपणे ठरविले. सारी शक्ती पणाला लावली. तो अतिप्रचंड वेगाने धावत निघाला. पन्नास... चाळीस... तीस... वीस... पंधरा... दहा... पाच... चार... हाय जंप...झूंऽऽऽ... फटाक्‌.... आई गं... मेलो...

सारा सत्यानाश झाला... हाय जंप थोडीशीच तोकडी पडली. काटेरी जाळीत पौरुष अडकले... पार नासाडी झाली... सारं अंग काटेरी तारांवरून सोलवटून निघालं आणि त्यातही आणखी दुर्दैव म्हणजे बैलोबा अलिकडेच पडले... कुरण राहिले दूर... कुरणाचा लोभ... पुष्ट गायींचे दर्शन... काटेरी तारा... म्हातारा बैल.... लॉंग रन... हाय जंप....झूंऽऽऽ... फटाक्‌.... आई गं... मेलो... पुन्हा पुन्हा बैलोबाच्या नजरेसमोरून हा सारा क्रम एखाद्या चित्रफितीसारखा दिसत होता... वेदनांनी अंग ठणकत होते. पौरुष तर लुप्तच झाले होते... फक्त रक्ताचे ओघळ दिसत होते...

म्हातारा बैल जवळ आला. आस्थेवाईकपणे डोक्यावरून जीभ फिरवीत त्याने सौम्यपणे विचारले, ‘खूप लागलं का रे बाळा?’ ... आता बैलोबाला रडू आवरत नव्हते. तो मुसमुसून रडू लागला. म्हातारा बैल धीराचा होता. त्याने शेजारी जाऊन फर्स्ट एड बॉक्स आणला. जुजबी मलमपट्टी केली. ‘टीटी’चं इंजेक्शन दिलं. पाठीने आधार देत त्याला थोड्याशाच अंतरावर असलेल्या एका पाणीसाठ्याजवळ नेले. चार घोट घशाखाली उतरताच त्याला बरे वाटते. म्हातारा बैल त्याला धीर देऊ लागला. असे अपघात होतच असतात, धीराने घ्यायचे... असे सांगू लागला.

आता मात्र बैलोबाचा संयम सुटला. मनापासून कातावून तो म्हणाला... ‘ते सगळं ठीक आहे. पण आता माझ्या आयुष्याचं नुकसान झालं ना ! सगळं ठेचलं गेलं. आता मी काय कामाचा?’

म्हातारा बैल म्हणाला, ‘अरे. आताच तर तू जास्त कामाचा. आजपासून तू कन्सल्टंट... सल्लागार. आता आपण दोघं मिळून पार्टनरशीपमध्ये नव्या पिढीला सल्ले देण्याचं काम करू...!’

वेताळाला सारा अर्थ कळला. पण विक्रमादित्याने मौनाची अट तोडली होती त्यामुळे काहीच न बोलता वेताळ भुर्रकन उडून निघून गेला. विक्रमादित्य डोके गच्च धरून बसला...!

15 जून 2011

लेखक पळवापळवीचे विपर्यस्त वर्तमान

-विश्वास पाटील 
' लेखकांची पळवापळवी' या गेल्या पुरवणीत प्रसिद्ध झालेल्या प्रकाशन व्यवसायातील वादावरील लेखाला लेखकांच्या बाजूने दिलेले उत्तर... 
(म टा 12 जून २०११) 
.............................................
गेल्या रविवारी आमचे मित्र मुकुंद कुळे यांनी मराठीतील लेखकांच्या पळवापळवींचे विपर्यस्त वर्तमान दिले आहे. ते बरेचसे वस्तुस्थितीला सोडून व ऐकीव गप्पांवर रचलेले आहे. एखादा साहित्यिक म्हणजे कोणा एकाच्या गोठ्यात बांधलेली गाय नसते. जर बाईंडरचा टाका ढिसाळ असेल अगर कागदवाला काळपट कागद पुरवत असेल तर तो बाईंडर वा कागदवाला बदलण्याचा जसा अधिकार प्रकाशकाला असतो, त्याच प्रकारे एखादा प्रकाशक वेळेत ग्रंथाच्या नव्या आवृत्त्या प्रकाशित करत नसेल, वर्षानुवषेर् रॉयल्टी बुडवण्याचाच धर्म पाळत असेल तर असा प्रकाशक बदलण्याचा पूर्ण अधिकार लेखकाला आहे. 

विशेषत: श्री. कुळे यांनी माझ्याबाबत केलेली विधाने चुकीची आहेत. प्रकाशन क्षेत्रातील कोणीतरी त्यांना ही माहिती खोडसाळपणे दिलेली दिसते. श्री. मेहता यांनी मला पळवायचा प्रश्नच उद्भवत नाही. आजही मी 'राजहंस प्रकाशन'चाही लेखक आहे. राजहंसने प्रकाशित केलेल्या माझ्या सर्व कादंबऱ्या त्यांच्याकडेच असून आमच्यातील व्यवहार व मैत्री तशीच दृढ आहे. 'संभाजी'बाबत जी दहा लाखाची गोष्ट कुळे सांगतात, ती कहाणी 'महानायक'ची. १९९७मध्ये माझ्या 'महानायक'साठी रॉयल्टीची आगाऊ रक्कम म्हणून श्री. अनिल मेहता यांनी दहा लाख रुपये देऊ केले होते. त्या गोष्टीस माधव गडकरी, शंकर सारडा व सदा डुंबरे हे साक्षीदार होते. मात्र मी त्या कादंबरीचे हस्तलिखित आधीच श्री. माजगावकर यांच्याकडे दिले असल्यामुळे कितीही मोठ्या रकमेला भुलून ते परत घेणे; मला सदाचाराचे वाटले नाही. तसेच 'संभाजी' पुढे नऊ वर्षांनी, २००६मध्ये प्रकाशित झाली. तेव्हा ती अन्य प्रकाशकाकडे द्यायचा निर्णय माझा स्वत:चा आहे. त्यासाठी मला भेटलेल्या तीन प्रकाशकांमधून मी स्वत:च श्री. सुनिल मेहता यांची निवड केली. माझी एखादी कादंबरी मी कोणाला एकरकमी देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. 'संभाजी' कादंबरीचे अंतरंग माहित नसतानाही माझ्या शब्दांवर भरवसा ठेऊन अकरा हजारांहून अधिक वाचकांनी प्रत्येकी ३८० रुपयांप्रमाणे अॅडव्हान्स बुकिंग केले होते. आयकर विभागाकडे सादर केलेल्या कागदपत्रांची साक्ष काढून सांगायचे तर आत्तापर्यंत सात मोठ्या आवृत्त्या प्रकाशित होवून 'संभाजी' या माझ्या एकाच कादंबरीची एकूण सत्तावीस लाख अठ्ठेचाळीस हजार तीनशे सदतीस रुपयांची रॉयल्टी मला धनादेशाद्वारे प्रकाशकांकडून प्राप्त झाली आहे. माजगावकर आणि मेहता या दोन्ही प्रकाशकांकडे मी सुखी आहे. 

एका प्रकाशकाकडून आपले ग्रंथ काढून दुसऱ्या प्रकाशकाला देणे, या पळवापळवीचा पहिला बळी मी असल्याचे श्री. कुळे जाहीर करतात. मात्र श्री. रणजित देसाई यांनी आपल्या हयातीमध्येच आपले ग्रंथ मेहतांना तर पु. ल. देशपांडे यांनी आपले बरेच ग्रंथ दुसऱ्यांकडून काढून मधूकाकांना दिले होते. त्यामुळे अशा तथाकथित पळवापळवीही पहिल्या बळीचा मान माझ्या वाट्याला येत नाही. या निमित्ताने रणजित देसाईंनी सांगितलेला किस्सा आठवतो. ते एकदा म्हणाले होते, 'माझी 'स्वामी'सारखी कादंबरी मागणी असूनही सलग आठ वर्ष बाजारात उपलब्ध नव्हती. मग मी लिहितो ते माझ्या वाचकांसाठी की प्रकाशकांच्या लहरीसाठी असा प्रश्न पडतो!' 

अकारण पहिला बळी (मासे पुस्तक काढून मी दुसऱ्या कोणाला देण्याचा तथाकथित अपराध केला नसतानाही) मला ठरवले गेले आहेच, तर या निमित्ताने चार गोष्टी स्पष्ट लिहिण्याचा गुन्हा मी करतोच. तसे कोणीतरी या विषयाला वाचा फोडणे आवश्यक होतेच. फक्त मराठीतीलच नव्हे तर अनेक भारतीय भाषेतील साहित्यिक व कवी प्रकाशकाकडे लाखात येणे असताना हलाखीत मृत्यू पावल्याची अनेक उदाहरणे आहेत. अलीकडेच मराठीतील एका मातब्बर लेखकांना डायलिसीसवर असतानाही व त्यांचे लाखात येणे असतानाही ऐन वेळी त्यांना आपले हक्काचे मानाचे धन मिळालेच नाही. लेखकाने फक्त मानसन्मान, वार्धक्यात विविध मंडळांनी दिलेले आणि एका रात्रीत सुकून जाणारे हार याच्यावरच जगायचे? त्याने किंवा त्याच्या वारसाने प्रकाशकादारी जावून घाबरत घाबरत रॉयल्टी मागायची? काव्यसंग्रह खपतच नाहीत असे जणू त्रिकालाबाधित गृहीत मनी धरायचे, तर दुसरीकडे विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात, झेडपी, राजाराममोहन रॉय ट्रस्टमध्ये कवींची नावे वापरून खूप काव्यसंग्रह खपवायचे. अन् मानधनाच्या पंगतीतून कवींना कायमच रिकाम्या दोण-पत्रावळीवरून तसेच उठवायचे हे प्रकार सर्रास चालू आहेत. 

श्री. अरुण जाखडे व श्री. मुकुंद कुळे यांनी प्रकाशकाची 'कल्पकता - प्रयोगशीलता' व 'लेखक घडवणे किंवा लेखकावर मेहनत घेण्याची' मिठ्ठास भाषा केली आहे. याचाच दुसरा अर्थ असा की, जणू वि. स. खांडेकर, रणजित देसाई आणि व्यंकटेश माडगुळकर अशा लेखकांचा जन्म केवळ प्रकाशकीय मेहरबानीवर झाला होता असे समजायचे काय? अशाच तुमच्या प्रकाशकीय कल्पकतेतून व प्रयोगशीलतेतून वरील तीन लेखकांच्या ताकदीचा किंवा आवाक्याचा एखादा तरी लेखक श्री. जाखडे यांनी घडवून दाखवावा, आम्ही त्यांचे जन्माचे ऋणी राहू. लेखकाचे वेळच्या वेळी मानधन देणाऱ्या काही चांगल्या प्रकाशन संस्था मराठीत आहेत. मात्र अशांची संख्या खूपच कमी. 

एकीकडे प्रकाशन व्यवसाय टिकला पाहिजे याचा अर्थ दुसरीकडे स्वत:च्या हक्काच्या मानधनाला वंचित राहून लेखकाने दारिद्यातच श्वास सोडायला हवा असा होत नाही. श्री. कुळे यांच्या लेखात 'जुने लेखक नैतिकमूल्यं जपणारे', 'पुढच्या पिढ्या मात्र सॉफ्ट टागेर्ट', 'ग्रंथव्यवसायाचे पावित्र्य', 'नैतिकता' अशी उच्च शब्दांची मांदियाळी मांडली गेली आहे. पण वास्तव मात्र भयानक आहे. एका महान लेखकाच्या अंत्यविधीला हजेरी लावण्यासाठी प्रकाशन व्यवसायाला वळण देणारे एक मातब्बर प्रकाशक एका जिल्ह्याच्या गावी गेले होते. तेथे त्यांनी हॉटेलात दोन दिवस मुक्काम केला. अन् त्या दोन दिवसांचा निवासखर्च त्या मृत लेखकाच्या रॉयल्टीतून वजा केल्याचे लेखी पत्र लेखकाच्या वारसांना तात्काळ धाडले गेले. मात्र गेल्या दोन-अडीच दशकांत प्रकाशकबुवांनी त्याच मृत लेखकाच्या शिल्लक मानधनांपैकी एकही छदाम अद्यापि दिलेला नाही. 

केवळ साहित्यसेवेची भाषा, साहचर्य वा पावित्र्याच्या बातांवर जनव्यवहार चालत नाहीत. सैनिकांप्रमाणेच लेखकालाही पोट असते. खपाच्या मोजक्या लेखकांचे मानधन देऊन इतरांचे बुडवणे असाही याचा अर्थ होत नाही! अनेक थोर वाङ्मयसेवकांनी आपल्या संसाराकडे, मुलाबाळांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केले. अहोरात्र शब्दांशी जणू संसार मांडला. समाजाने त्यांना नानासाहेब, अण्णासाहेब, तात्यासाहेब, भाऊसाहेब अशा बिरुदावल्या देऊन मानपान दिले. त्यांचे ग्रंथ वर्षानुवषेर् खपत राहिले. मानधन बिचारे तसेच साचत राहिले. त्याचा ओघ लेखकांच्या उंबरठ्यापर्यंत पोचलाच नाही. मग व्याख्याने, स्नेहसंमेलने, काव्यवाचन तर कोणी कथाकथन करायचे. प्रेमाने मिळालेल्या त्या तुटपुंज्या रकमेवर कष्टाने संसार चालवायचे. अशा महाराष्ट्र भटकंतीचा अनेकांच्या आरोग्यावर पुन्हा परिणाम झालाच. तर अनेकांनी पुस्तके खपत असतानाही रॉयल्टीच्या रकमेवर फाजील भरवसा न ठेवता कोणी मास्तरकी तर कोणी प्राध्यापकी स्वीकारून अंगातल्या साहित्यसेवेच्या झटक्याला वेळेतच मुरड घातली, अशांच्या कुटुंबियांचे भाग्य थोरच मानायचे. 

श्री. कुळे म्हणतात त्याप्रमाणे प्रकाशन क्षेत्रात त्सुनामी आल्या असतील तर अशा अनिष्ट प्रवृत्तींशी संघर्ष करायलाच हवा. त्या लढ्यामध्ये उतरायला अनेक कवी व लेखक मित्रांनी माझ्याकडे संमती दर्शवली आहे. मात्र या संघर्षाची सुरुवात करण्यापूवीर् मराठीतील प्रकाशक मित्रांंनी किमान कागदावर दाखवलेल्या वर्षानुवषेर् तुंबलेल्या वा नजरचुकीने राहून गेलेल्या सर्वच लेखकांच्या रॉयल्टीच्या रकमा चुकत्या कराव्यात, म्हणजे आपल्या नैतिक संघर्षाला खऱ्या अथीर् धार चढेल. 

केवळ मराठी प्रकाशन व्यवसायाच्या जोरावर अनेकांनी माड्या-हवेल्या उभारल्या. त्यांच्या त्या यशकर्तृत्वाबद्दल माझ्या पोटात दुखायचे कारण नाही. पण या महालांचे चिरे रचताना अनेक साहित्यिकांनी आपले रक्त, घाम आणि अश्रू वेचले आहेत. 

अलीकडे मी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलेला एक भयंकर प्रसंग आठवतो. ज्या एका महान मराठी साहित्यिकाने मराठी भाषेलाच नव्हे, तर भारतीय साहित्याला वळण दिले. ज्यांच्या कादंबऱ्यांवर आमच्या काही पिढ्या पोसल्या, त्या कादंबऱ्यातील नायक-नायिकांची नावे जनांनी आपल्या मुलांना ठेवली. अशा थोर लेखकाच्या वारसदारांनी त्यांचा मौल्यवान ग्रंथसंग्रह, त्यांना भेटीदाखल अन्य भाषेतील लेखकांनी दिलेले ग्रंथराज रद्दीत विकत घातले. आपल्या युगप्रवर्तक पित्याचा असा अमूल्य ग्रंथसंग्रह रद्दीत काढताना त्यांच्या मुलांना काय कमी दु:ख झाले असेल? पण तीस-तीस वर्ष मानधनाचा छदाम मिळणार नसेल तर ते बापुडे तरी दुसरे करणार काय! सुदैवाने माझ्या मानसिंग कुमठेकर नामक एका जागरुक ग्रंथप्रेमी मित्राच्या निदर्शनास ही बाब वेळीच आली. त्याने दामदुपटीने तो ग्रंथसंग्रह विकत घेतला आहे. मोठ्या पावित्र्याने आपल्या घरी जिवापाड जपला आहे. मायमराठीच्या त्या अग्रगण्य कादंबरीकाराला भगवान बुद्ध आणि हिटलर - अहिंसा आणि हिंसा या विषयावर एक दीर्घ पल्ल्याची कादंबरी लिहायची होती. त्यासाठी त्यांनी काढलेली टाचणे, त्या टिपण्या आणि आराखडे त्याच ग्रंथसंग्रहाच्या पिवळ्या, जुनाट पानाआड जेव्हा मला आढळून आले तेव्हा मला अश्रूंचा बांध आवरता आला नाही! ही घटना कपोलकल्पित वाटत असेल तर टीव्हीचा कॅमेरा सोबत घेऊया. आधुनिक युगात खऱ्या अथीर् माझ्या मराठीचा वेलू गगनावर नेणाऱ्या त्या थोर साहित्यिकाचा केवळ नशिबाने वाचलेला तो ग्रंथसंग्रह श्री. मुकुंद कुळे आणि श्री. अरुण जाखडे या दोघांना प्रत्यक्ष नेऊन दाखवायची माझी तयारी आहे. 

<http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/8818374.cms>

4 जून 2011

स्वर्गलोकीचा नवा 'बाय लॉ'

नारद महर्षींच्या तमाम वंशजांना जेहत्ते कालाचे ठायी कलियुगी औरंगाबाद उर्फ संभाजीनगर उर्फ खडकी ग्रामी रुजू जाहल्याबिगर मोक्ष मिळणार नाही असा ‘बाय लॉ’ सांप्रतात स्वर्गलोकी झाला आहे काय, ऐसी शंका यावी असे वातावरण सध्या अखिल महाराष्ट्रभर पसरले आहे. कोणीही उठतो अन्‌ औरंगाबादी सुटतो. हा काय प्रकार असावा बरे? भोपाळसेठांनी ‘कुमार’ आणला की ऋषिमुनींनी त्यामध्ये भर टाकत ‘भरत कुमार’ आणावा... काय बरे हे गुपित असावे? ही काय कुरघोडी करणेची पद्धती झाली? की एकाने ‘आम्ही निःपक्ष’ अशी आरोळी ठोकली की दुसर्‍याने ‘आम्ही सर्वपक्ष’ म्हणत सगळ्या पक्षांचा गोतावळा जमा करायच्या मागे लागायचे? आमच्या दुकानात भाजप आहे, शिवसेना आहे, भाकप आहे, माकप आहे, राष्ट्रवादी आहे आणि कॉंग्रेस तर आमच्यातच आहे...! छान आहे बरें...!

नाशकात दिवे पेटणार...!
असो. आमचे अनुपस्थितीत महाराष्ट्रदेशी बरेच काही घडते आहे. घडले आहे. नाशिक श्रीक्षेत्री दिव्याचा प्रकाश लवकरच फाकणार असलेले वृत्त आहे. तेथील सर्व्हे पूर्ण होत आले असून लवकरच प्रत्यक्ष कामास सुरवात होणार असल्याचे वृत्त आहे. साहजिकच जळगाव-धुळे-नंदुरबार पट्‌ट्यातही लगोलग प्रकाश फाकू लागेल. तिकडे औरंगाबादी दिवा पेटविण्यास साक्षात देशाचे गृहमंत्री आले... काय सांगावे महाराज - साक्षात गृहमंत्री! आजकाल त्यांच्याकडे बराच वेळ दिसतो. पण त्यांचे निमित्त चुकले. एका पेपरच्या प्रकाशनाला आल्याने इतर पेपरवाल्यांनी ती बातमी ‘किल’ केली. वृत्तपत्रसृष्टीसाठी किती अभिमानाची गोष्ट आहे ना ही? देशाचा साक्षात गृहमंत्री आपल्या शहरात प्रथम येतो आणि त्याची दखलही ठळकपणे घ्यायची नाही... बहुदा वाचकांची मर्जी सांभाळण्याचीच ही रीत असावी. किंवा मग विष्णु भागवताचे पुराण लावायलाच जागा पुरत नसल्याने अशा ‘फालतू’ बातम्यांना स्थान उरत नसावे! तर मंडळी, नाशकातील दिवे लागण्याआधी जालना, बीडमधील दिवे प्रकाशणार आहेत म्हणे. मग नाशिक-धुळे-नंदूरबारचा पट्टा. त्यानंतर पुणे आणि मग अंबाबाईचे कोल्हापूर... होश्शियार.

बहन मायावतींचा विजय असो?
आम्ही तिकडे यूपीत होतो. परमआदरणीय मायावतीबहन यांच्या आदेशावरून एका भव्य स्थळी आमची निवास-भोजनाची व्यवस्था होती. पेयपानाची सोय मात्र त्यांच्या भक्तजनांकडून प्रायोजित करण्यात आली होती. जयललिता अम्मा यांच्या सेवेत आम्ही बजावलेली कामगिरी बहनजींपर्यंत पोहोचली. म्हणतात ना... कीर्तीचा सुगंध कस्तुरीसारखा दर्वळत असतो. खर्‍या दर्दींनाच तो कळतो आणि आम्हास बोलावणे धाडले जाते. (इथे महाराष्ट्रात सर्वांनाच सर्दी झालेली दिसते.) बहनजी आतापासूनच तयारीला लागल्या आहेत. पुढच्या निवडणुकीत कुणाशी युती करायची की एकट्यानेच लढायचे, हा त्यांचा पहिला अजेंडा आहे. त्यातच राहुलबाबांनी दिग्विजयसिंहांच्या प्रेरणेने जे दिवे पाजळले, त्यामुळे या प्रांती कॉंग्रेसचे बरेच हसे झाले आहे... पण आम्ही हे सारे आपणास का सांगतो आहोत? हा विषय बंद.

दिव्यांखाली उजेड... 
तर आपण कुठे आले होतो? (असे म्हटले की उगाचच ज्येष्ठ पत्रकार झाल्यासारखे वाटते, नाही?) औरंगाबाद देशी महान महान पत्रकारमहोदयांचे येणेजाणे वाढले आहे. एका कुमाराला सोबत म्हणून दुसराही कुमार औरंगाबादी संस्थेमध्ये जॉईन झाला. काय पण कमाल आहे बरे... आम्ही ऐसे ऐकून आहोत की वार्षिक 55 लाखांवरून 56 लाख अशी वाढ घेऊन ते आपल्या ‘मर्जी’ने जॉईन झाले म्हणे. एक लाखात काय येईल? असो. हा ज्याचा त्याचा प्रश्न. 
पण कुमारस्वामी मात्र ग्रेट आहेत. शुभारंभीच त्यांनी आपल्या वैश्विक लेखनातील वैश्विक संदर्भात जागतिक दर्जाच्या तीन चुका केल्या. (‘त्यांनी’ म्हणायचे कारण, की असे लेखन तेच करीत असावेत, असे आम्ही मानतो. भले ते कोणीही लिहो, त्याचे भलेबुरे मुख्य संपादकांच्याच खात्यावर जमा होणार ना!) पण ते अतिशय खुल्या दिलाचे आहेत. दुसर्‍या दिवशी अनेकांनी त्यांच्या ते लक्षात आणून दिले आणि तिसर्‍याच दिवशी त्यांनी सविस्तर खुलासा छापला. म्हणजे - फक्त ‘आम्ही दिलगीर आहोत’ अशी पट्टी नव्हे, तर त्या लेखात काय लिहायला हवे होते आणि काय छापून आले, हे त्यांनी सविस्तर सांगितले... मग, आमची भूमिकाच तशी आहे. वाचकांना सारे काही नीट समजून सांगायला हवे. मागचे-पुढचे-खालचे-वरचे-इकडचे-तिकडचे-सगळीकडचे त्यांना नीट समजले पाहिजे. असो, कार्यबाहुल्यात एवढ्या चुका होणारच. भले नाव मुख्य संपादकांचे असले, तरी ज्यांनी कोणी तो लिहिला, त्याने लिहिल्यानंतर स्वामींनी तो नीट तपासला नसावा. नाहीतर स्वामी अशी चूक करणार नाहीत. आमची खात्रीच आहे. बहुदा, औरंगाबादी त्यांना लेखनिक चांगले मिळत नसावेत.

सकाळी सकाळी अंधार...!
असो. मध्यंतरी या उलाढाली सुरू असताना एका भविष्यपत्राचे बारावे (सॉरी बारावा वर्धापनदिन) साजरा झाला. आता, याला ‘साजरा’ म्हणायचे की नाही हा प्रश्नच आहे. साजरा हा शब्द आमच्याकडे जनरली आनंदाच्या वेळी वापरतात. मराठवाड्यातही तशाच अर्थाने वापरत असावेत, असा आमचा समज आहे. तर, या वेळी भविष्यपत्राच्या वर्दापनदिनी साक्षात मोठ्‌ठ्ठया साहेबांना औरंगाबादी यावे लागले. 
एरव्ही, सध्या धाकटे साहेबच सारे काही सांभाळतात. खरे तर सध्या मोठ्या साहेबांंनी ऐच्छिक संन्यास घेतला आहे म्हणे. चिरंजिवांच्या हाती सुत्रे देऊन ते हरि हरि करण्याच्या मूडमध्ये होते. हा मूड औरंगाबादकरांनी खराब केला. रुपयात अंक विकूनही तब्बल 40 टक्के सर्क्युलेशन कमी झाल्यावर दुसरे काय होणार? बरे, नुकतेच पगारही वाढवून दिलेत. तरीही हा प्रकार? झाप झाप झापले म्हणे..! पण स्टाफ तरी काय करणार? एक रुपयात पेपर दिला तरी लोकांनी रुपया तरी का द्यावा? आणि पेपरात काय वाचावे? यांच्याच बातम्या, यांचीच प्रदर्शने, यांचेच चॅनल आणि यांचेच इव्हेंट. कमी अधिक झाले, तर यांना मदत न करणार्‍यांवर आगपाखड...! त्या बिचार्‍या विष्णू भागवतचे तर नशीबच फुटले. यांनी त्याचे साग्रसंगीत पुराण छापले. ते कमी पडले म्हणून की काय आता गावातल्या सगळ्या बसस्टॉपवर असलेल्या होर्डिंगवर ‘त्या’ बातमीचे कात्रण असलेला अंक मोठ्ठा करून झळकवताहेत... ‘आम्हीही सूड उगवू शकतो’ हे दाखवून देण्याची ही युक्ती लई भारी आहे... मोठ्‌ठ्या जाहिरातदारांनो सावधान. इथून पुढे इतर कोणाला जाहिराती - प्रायोजकत्व द्याल आणि आम्हाला नाही म्हणाल, तर बघून घेऊ... हां...!

कुमारस्वामींचा रविवार
दिव्याच्या प्रथम प्रकाशात न्हाऊन निघताना आम्हाला आश्चर्य एकाच गोष्टीचे वाटले, की कुमारस्वामींचा लेख रविवार पुरवणीच्या पहिल्या पानाऐवजी पाचव्या पानावर कसा? पहिले पान म्हणजे स्वामींचा अग्रहक्क. त्यावर कोणी अतिक्रमण करणे त्यांना बरे सहन होईल? पण ही सहनशक्ती त्यांच्यात आली... भोपाळसेठमुळे की कोणामुळे? कोणामुळे का असेना, रविवार पुरवणीचे पहिले पान ही तिकडे ‘रोखठोकी’ची मक्तेदारी आणि इकडे कुमारस्वामींची ‘परदेशवारी’. कुमारस्वामींच्या लेखनाचे एक वैशिष्ट्य आहे. ते कायम वैश्विक पातळीवर असते. मग उद्या त्यांनी औरंगाबादच्या गटारांचाही प्रश्न मांडायचे ठरविले, तरी त्यांना युरोपातील बर्मिंगहम परिसरातील गटारांचे वर्णन करावेसे वाटणार. असा वैश्विक दर्जाचा संपादक मराठीत निपजला, हे मराठी सारस्वताचे परमभाग्यच!

18 नारळ तयार...
आम्ही प्रारंभीच म्हटल्यानुसार दिव्याच्या प्रकाशात न्हाऊनही डोक्यात उजेड न पडलेल्या अनेकांचे नारळ देण्यासाठी पहिल्याच महिन्यात नंबर लागले असल्याचे आमच्या तीक्ष्ण कानांनी ऐकले आहे. कोणी पस्तीस हजारी मनसबदार आहे, कोणी तीस हजारी आहे, कोणी बावीस हजारी आहे, अशा खोटेनाटे दावे करून भल्या मोठ्या मनसबदार्‍या मिळविलेल्या पण हाती दारुगोळा अथवा फौजफाटा नसलेल्या मानाच्या गणपतींचा ‘बाप्पा मोरया’ होणार असल्याचे कळते. 
साहजिक आहे, भोपाळसेठनी काढलेला पेपर पत्रकारांचे पगार वाढविण्याच्या हेतूने नव्हे तर त्यांचा धंदा वाढविण्यासाठी काढला. काहीपण दावे करून आपल्या पर्सनॅलिटीच्या जोरावर मिळविलेली पदे आणि पगार प्रत्यक्ष कामात उतरल्यानंतर टिकविणे अवघड जाणार, हे भाकित आम्ही आधीच केले होते. पहिल्या महिन्यातच त्याची प्रचिती आली. चावडीवर उभे राहून लंब्याचौड्या बाता मारणे आणि प्रत्यक्षात काम दाखविणे यात जमीन आस्मानचे अंतर असते, हे सर्वांच्या लक्षात आले असेलच. ‘बाकी सारी खोगीरभरती’ या लेखांकात आम्ही वर्णन केल्याप्रमाणेच सारे काही घडते आहे. जे चांगले घडते आहे त्याचे आम्ही स्वागत करतो. या 18 जणांना त्यांच्या वकुबाप्रमाणे काम आणि पैसा मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना.

पण आता या मुळे दिव्याखाली या 18 जागांची व्हेकन्सी निर्माण होते आहे. ती भरण्यासाठी आता फक्त दुसर्‍या शेटजींचेच घर उरले आहे. तिथून माणसांची आवक आता चांगल्याच वेगाने सुरू झालेली दिसते. त्यामुळे शेटच्या कंपूतही घबराट पसरली असून तेथे नवीनवी माणसे घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत म्हणे. पुणेरी जहागिरीत आणखीही काही चांगली माणसे उरल्याचे आम्हाला कळते. त्यातील दोन-तीन जण लवकरच तीसहजारी मनसबदार म्हणून शेटजींचरणी रुजू होणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.

बाकी, लेट अस कीप इन टच...

1 जून 2011

पुन्हा एकदा नमस्कार...!

काही एका खास कारणासाठी आम्ही हा ब्लॉग सुरु केला. काहीतरी झकास वाचायला मिळावं असा आमचा प्रयत्न आहे. आजकाल पेपरच्या आठ स्तंभात काही शैलीदार वाचनीय सापडत नाही. ही उणीव भरून काढत असताना काही नर्मविनोदी टोले मारावेत असा आमचा प्रयत्न आहे.

हा बातम्या देणारा ब्लॉग नाही... बातमीमागील विश्लेषण आणि त्यातील गम्मत असा याचा प्रवास आहे. मागचे काही आम्ही दिवस विसावा घेतला. उत्तर प्रदेशात मायावती यांनी आम्हाला बोलावून घेतले होते. जयललिता यांच्यासाठी आम्ही दिलेली सेवा मायावती यांना आवडली. आता आम्ही अधून मधून यु पी मध्ये जाणार. त्यामुळे खंड पडत राहणार. दुराव्यानन्तरचा गोडवा अधिक असतो असे म्हणतात.

असे असले तरी आमचे लक्ष महाराष्ट्राकडे होतेच. पुण्यात उलाढाली चालू आहेत, औरंगाबाद मध्ये दिव्य मराठी सुरु झाला, औरंगाबाद सकाळ चा वर्धापन दिन साजरा होतो आहे, लोकमत मध्ये बरीच घालमेल चालू आहे... खूप काही ऐकू येत आहे. साहित्य वर्तुळात सुद्धा बरीच खलबते चालू आहेत. विश्व संमेलनाला कोणाकोणाला फुकटात न्यायचे यावर तिथे वाद चालू आहे म्हणे. बघू. आम्ही आढावा घेतो. मग बघू. लवकरच भेटू.